कर्नाटक संगीत- कचेरीत व नृत्यासाठी !

सुप्रसिद्ध कर्नाटक गायिका 'नंदिनी गुजर' यांच्याशी सहजच साधलेल्या कर्नाटक संगीतावरील संवाद:

नंदिनी गुजर

भारतीय प्राचीन संगीत म्हणून 'कर्नाटक' संगीत ओळखले जाते.  या संगीताचे महत्त्व आणि लोकप्रियता दक्षिण भारतात अधिक असली तरी आज शास्त्रीय नृत्यशैलींमुळे दक्षिण कला व परंपरांशी ओळख महाराष्ट्राची झालेली आहे. आज भरतनाट्यम् सारखी दाक्षिणात्य शैली महाराष्ट्रात व देशभरात प्रसिद्ध आहे, मग त्याला कर्नाटक संगीत नक्कीच अपवाद नाही... या कर्नाटक संगीताशी ओळख व नृत्याशी असलेला त्याचा संबंध गायिका 'नन्दिनी गुजर' यांच्या एका छोटया मुलाखतीतून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न.....!




तुमची कर्नाटक संगीताच्या शिक्षणाची सुरुवात कशी झाली?

मला सुरवात करून आता २० वर्षे झाली. मी ५ वर्षांची असताना शिकायला सुरवात केली. शिमोगा नावाच्या कर्नाटकातील एका छोट्या गावातून मी गुरु प्रसन्न वेंकटेश यांच्याकडून शिकायला सुरुवात केली. बंगलोरला आल्यावर बी. आर. श्रीधर या मृदंगम् कलाकाराकडून शिकले. त्यानंतर गुरु नागमणी श्रीनाथ आणि आत्ता चेन्नईला रंजनी-गायत्री यांच्याकडून शिक्षण घेत आहे. आपण लहान असताना पालक आपल्याला गुण जाणून घेऊन शिकायला पाठवतात, असाच माझाही प्रवास सुरु झाला. वयाच्या १२ व्या वर्षी मी सर्वप्रथम रंगमंचावर गायले.

तुम्ही कर्नाटक कचेरीत संगीताची सुरुवात कशाने करता?

आम्ही वर्णम् या रचनेपासून सुरवात करतो. पण, भरतनाट्यम्मध्ये जसा वर्णम् सादर होतो तसा नसून गायक पल्लवी, अनुपल्लवी सलग गातो. मग मुक्ताई स्वर, त्यानंतर चरणम् आणि येत्तूगडै स्वर असे अगदी ३ ते ५  मिनिटांचे सादरीकरण असते. जे आम्ही मध्य लयीपासून गातो. आमच्यासाठी तो ‘वॉर्मअप पीस’ असतो. त्यानंतर गणपती स्तुती किंवा कार्यक्रमाच्या संकप्लनेनुसार रचना गायली जाते. तसेच एखादी विलंबित किंवा मध्यम लयीतील रचना, ज्यात आलाप, कल्पनाविस्तार गायला जातो.

कर्नाटक कचेरीतील प्रमुख सादरीकरण काय असते?

प्रमुख रचना जी २५-३० मिनिटे किंवा १ तास सादर होते. त्यात विलंब कालातील रचना शक्यतो गायली जाते. त्यात आलाप, रचना, नेरवळ, स्वरम येते. दुसऱ्या भागात पदम्, जावळीसारख्या रचना येतात.

दक्षिणेत अनेक भाषांतील रचना असताना गायक निवड कधी करतो?

कन्नड गायक दास-पद, तिल्लाना, तमिळ कलाकार विरुत्तम, तमिळ रचना, तेलुगु गायक- अन्नमाचार्य, भद्राचार्य यांच्या रचना, मल्याळमचे स्वाती तिरुणालच्या रचना असे, असे प्रत्येक कलाकार त्याच्या भाषेप्रमाणे निवडतो. पण पूर्वार्ध महत्त्वाचा असतो; कारण त्यात प्रमुख रचना गायली जाते. ‘रागम्-तानम्-पल्लवी’ म्हणजे २ ओळींची रचना कलाकार आपल्या पद्धतीने सादर करतो, ती एखादया देवतेवरची किंवा संकल्पनेवरची, एखादया अवघड रागातील असते.

गायनाचा शेवट कशाने करता?

ते कलाकारावरच अवलंबून असते. तिल्लानाने शेवट करून अगदी शेवटी मंगलम् ही गातो, जसे कि त्यागराजांचे ‘पवमान’. बरेचदा श्लोकाने शेवट करतात. गायकाला स्वातंत्र्य असते.

नृत्यासाठी गाताना गायकाला कोणती आव्हाहने येतात?

खूप बंधने येतात. पण खूप शिकायलाही मिळते. आम्हाला नृत्यासाठी गाताना मग खूप सर्जनशील होता येते. नर्तक जेवढ्या संचारी करतो त्याप्रमाणे आम्हाला गावे लागते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाव. नर्तक दाखवत असलेल्या भावभावनांचाही विचार करावा लागतो, त्याप्रमाणे आम्हाला ते आमच्या गाण्यातूनही मांडावे लागते. तट्टीमेट्ट  करताना मध्य लयीत गावे लागते. जेव्हा कथा येते तेव्हा आलाप गाण्याऐवजी आम्ही ते व्हायोलीन, मृदंगम् वर  सोडून देतो. बरेचदा स्वरम्, तानम् चा वापर करतो. तिल्लानासारख्या रचनेत पल्लवीची पुनरावृत्ती होत असते. तिथे थोडे फार बदल आम्ही गाताना करण्याचा प्रयत्न करतो.

कर्नाटक संगीत विद्यार्थ्यांना शिकवतानाचा तुमचा अनुभव कसा आहे?

पुण्यात खूप कमी आवड आहे. पुण्यात एक तर शिक्षक नसतो किंवा विद्यार्थी नसतात, त्यामुळे आव्हाहानच असते. पण, भरतनाट्यम् मुळे बराच प्रतिसाद लाभालाय. पण शिकवताना आनंद मिळतो. खूप वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी येत असतात आणि आपण शिकवत असताना स्वतःही शिकतच असतो.

एक कर्नाटक गायिका म्हणून तुम्हाला काय सांगावेसे वाटते?

खरंतर, भरतनाट्यम् नर्तकांनी कर्नाटक संगीताचे शिक्षण घ्यायला हवे. दक्षिणेत मात्र नर्तकांना परीक्षेत संगीत बंधनकारक असते, असे इथे नाहीये. गायक काय करतो, कसे व् कशा पद्धतीने गातो हे कळले पाहिजे. संगीत आणि नृत्य हे एकमेकांना अगदी जवळचे आहे. पुण्यात ज्या विद्यापीठांमध्ये नृत्यात पदवी दिली जाते, तिथे विद्यार्थ्यांसाठी कर्नाटक संगीत शिकणे बंधनकारक करायला हवे. कर्नाटक संगीताचे कार्यक्रम ऐकले पाहिजेत. त्यामुळे नर्तकाची निर्मितीक्षमताही वाढते. म्हणूनच ह्या संगीताचे शिक्षण आवश्यक!


- नंदिनी गुजर.
- मुलाखतकार: स्वरदा.






Master of Music, Madras University. 
MBA, Bangalore University.
With her significant work as a Carnatic Classical vocalist and performances for more than 20 years now, Nandini Rao Gujar is pursuing her research in different styles of Devotional music not just from South but from all over India.
Television, live performances, anchoring, accompanying for dance performance, composing, song writing teaching- Vidushi Nandini has discovered different aspects of related arts- at a relatively young age. 
Her work was recognised by the government of Karnataka by conferring the prestigious Kempegowda Award.
With her maiden solo at the age of 12, Nandini has given more than 800 concerts all over India and abroad. She has given her voice for more than 100 Audio cd's.
She is a professor at FLAME School of Performing Arts and guest faculty Pune University.
Founder at 'Sound of Southern India',an institute of Carnatic Classical Music in Pune, in which many students are trained in classical and other aspects of Carnatic Music.






Comments

Popular Posts