"मुक्तक"

"ओळख एका कवीची आणि त्याच्या काव्यांची"

"जे जे ज्यावेळी मनात उमटलं, ते तसंच्या तसं अक्षरांतून झरण म्हणजे ‘मुक्तक’. इथे विषयांचं बंधन नाही. कधी ‘तो’ आणि ‘ती’च्या भोवतीचा पिंगा आहे, तर कधी थेट माउलींच्या समाधीची आर्तता आहे. कधी पावसाचं मुग्ध गान आहे, तर कधी तुकोबांच्या कीर्तनाचा रंग आहे. कधी थेट जगज्जननीला हाक आहे, तर कधी पांडुरंगाच्या पायाखालच्या विटेच गूज आहे. जे काही आहे ते बेभान आहे. आतून उमटलेलं आणि त्या क्षणीच नक्षी उमटलेलं. आपला आपल्याशी असलेला संवाद असतो तो. कधी प्रश्न विचारतो तो, कधी उत्तर देतो. कधी दिसलेलं काही फक्त नोंदवत राहतो."

- अभिजित थिटे 






काव्यसंग्रहातील काही कविता: 

{ मुक्तक पुस्तकाची ई-बुक लिंक- http://www.bookhungama.com/index.php/e-book/marathi/kavita/muktak.html }


"अबोली"

रंग अबोली खुलता गाली
खळीदार ते हास्य खुले 
झुकल्या नेत्री लाजाळूपरी
मिटल्या ओठी हास्य झुले 

गंध अबोली दडला गात्री 
शिरशिरी हळवी गोड फिरे 
टिपूर दवापरी हळव्या नाजूक 
स्पर्शासाठी पण झुरे 

अबोल अबोली करकमलावरी
नाजूक गिरकी घेत फिरे 
नाजूक हाती नाजूक गिरकी 
तिथेच सार जीव अडे!  

{ 'रंग अबोली' ह्या कवितेची video ची लिंक- https://www.youtube.com/watch?v=xfZ7yTT9O7A&feature=youtu.be }


"ज्ञानदेवा"

जाहला अंधार, लोपला दिनकर 
रात्र ही भयाण दाटून आली 
मन हे व्याकूळ, सापडेना सूर 
करावे काय आकळेना 

भेटलास तू, दिले आत्मभान 
पाहुनी प्रकाश शांतावलो 
समाधी बैसोनि श्रांतविसी देवा 
मनासी देसी आत्मप्रबोध 

मनाचे भेद केलेस दूर 
द्वैतातुनी अद्वैती नेलेस बा 
कसा होऊ तुझा बापा उतराई 
माउली झालास ज्ञानदेवा 

उधळीशी प्रेम, देसी साक्षात्कार 
मज पामराला दावी प्रकाश 
किती गाऊ आता, वर्णू किती गुण 
मती तोकडी ती पडते आहे...


"मदनवेळा"

होतीस सवे, अन् रम्य रातिची वेळ 
चंद्रही खेळतो दिक्पटलावर खेळ 
ती अरुंधती अन् शुक्राची चांदणी 
मदन-रतीची रंगे मधुर कहाणी...

हातीच गुंफले हात नकळे जेथ 
नजरही गुंतिली नजरेतच मग थेट 
मदन सख्याने घेत रतीची आण 
मग थेट ताणला प्रत्यंचेवर बाण...

दाटली मिठी मग तडफड दोन्ही अंगे 
तो खेळ नभीचा रंगे अति आनंदे 
हलकेच चुंबिला गाल उतरली लाली 
उमलला ओठ, श्वासात गतीही आली...

उचलली हनुवटी स्वैर सोडिले केस,
उमलुनी येई मग तव देहीची वेस 
तो चंद्र खुळावे पाहुनी कमनिय वळणे 
त्या मधुघटी जाऊनी अस्तावे तो चाहे...! 


"अश्वत्थामा"

भळभळत्या मनाची जखम
अनुभवलेली असते
आपणही कधी ना कधी

भळभळत्या मनाचं दुःख
अनुभवलेलं असतं
आपणही कधी ना कधी

आणि भळभळत्या मनाची वेदना
कोणालाही न सांगता
आपणही भोगलेली असते
कधी ना कधी

आपण सारेच असतो अश्वत्थामा
एखादी जखम घेऊन
आयुष्यभर चालणारे

जखम शरीराची असते,
तशीच मनाचीही असते
याही जखमेवर खपली धरते,
तशीच त्याही जखमेवर धरते
फरक इतकाच.....
मनामध्ये खपलीखालची जखम
कायम ओलीच राहते....
ती भरून येतच नाही कधी..

कधीतरी काहीतरी कारणानं
निघते खपली
आणि जखम पुन्हा एकदा
भळभळू लागते
पुन्हा एकदा तो अश्वत्थामा मग
फिरू लागतो तेलाच्या शोधात.

सहानुभूतीची नजर,
सहानुभूतीच बोलणं,
कायमच फुंकर घालणारं नसतं.
मुळात गरजही नसते
सहानुभूतीची.
कधीतरी गरज असते दुर्लक्ष करण्याची.
जखम आहे किंवा नाही,
याकडे साफ पाठ फिरवण्याची.

पाठ फिरवली , कि जखम थोडी सुस्तावते
तिची ठसठस होते थोडी कमी
आणि आतल्या जिवाची ओढ
घेते थोडी विश्रांती...

अश्वत्थामाला हेच हवं असतं
थोडं विसरणं, थोडं सोडून देणं.


कितीही विसरायचं म्हटलं,
तरी विसरता येत नाही,
कपाळावरचा कलंक
काही केल्या पुसला जात नाही
ठसठस कमी होते आहे असं वाटतं
आणि उफाळून येते तितक्याच वेगानं
अश्वत्थामा तळमळतच राहतो,
जीव जळतच राहतो.


हो किंवा नाही स्पष्ट सांग
विषय एकदाच संपून जाईल
हे म्हणणं सोपं असतं,
उत्तर पचवणं अवघड.
ते उत्तर बोचत राहात
आतल्या आत, कायम.
अश्वत्थामाच्या जखमेसारखं.

अशी बोच अवघड असते
असं जळणं अवघड असतं
वरून राख साठत राहाते
आत जीव धुमसत राहतो
एक क्षण येतो शांततेचा
घुसमट थांबण्याचा.
आता हवं असतं पाणी
शांत होण्यासाठी, थंड होण्यासाठी
नेमका अश्वत्थामा मागतो तेल,
आणि धुमसत राहतो
पुन्हा एकदा नव्या जोमानं
आयुष्यभरासाठी.....

म्हणूनच जखम चिरंजीव आहे
म्हणून ती घेऊन फिरणारा
अश्वत्थामाही चिरंजीव आहे...








अभिजित थिटे


गेली १३ वर्षं पत्रकारितेत. सध्या महाराष्ट्र टाइम्सच्या पुणे आवृत्तीत विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत.  ‘तेजशलाका इरेना सेंडलर’, हे दुसऱ्या महायुद्धातील इरेना सेंडलर यांच्या विशेष कामगिरीवरील पुस्तक प्रकाशित. हे पुस्तक इंग्लिशमध्येही भाषांतरित झाले आहे. याशिवाय ‘अ टर्न अराउंड स्टोरी’ हे रेल्वेवरील पुस्तकही प्रकाशित आहे.

बिल क्लिंटन यांचे ‘गिव्हिंग’, ‘rich dad poor dad’ च्या मालिकेतील पहिली पाच पुस्तके, ‘मनःपूर्वक खुशवंत’ हे खुशवंतसिंगांचे शेवटचे पुस्तक अशा ७ पुस्तकांचा अनुवाद आतापर्यंत प्रकाशित झाला आहे.

‘मुक्तक’ हा पहिलाच काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून, ‘मुक्ती’ ही गूढ कादंबरी लवकरच प्रकाशित होणार आहे.



Comments

Popular Posts